रेल्वेसाठी विद्यार्थ्यांची एल्गार : अकोलेतील शाळकरी मुलांकडून मुख्यमंत्र्यांना ५,००० पत्रे
पुणे–नाशिक प्रस्तावित हायस्पीड रेल्वेमार्ग अकोले तालुक्यातूनच जावा, या मागणीसाठी आता विद्यार्थी वर्गही आक्रमक झाला असून अगस्ती विद्यालय व मॉडर्न हायस्कूल, अकोले येथील विद्यार्थ्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना ५,००० पत्रे पाठवून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
या उपक्रमाचा भाग म्हणून अगस्ती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आज रॅली काढून अकोले शहरात जनजागृती केली. हातात फलक, घोषवाक्ये आणि पत्रांच्या प्रती घेऊन विद्यार्थ्यांनी शांततामय मार्गाने आपली मागणी मांडली.
“रेल्वे अकोलेमधून गेलीच पाहिजे”, “अकोलेचा विकास आमचा हक्क” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
विद्यार्थ्यांनी पाठवलेल्या पत्रांमध्ये अकोले तालुक्याची भौगोलिक स्थिती, शिक्षण, रोजगार, पर्यटन आणि आर्थिक विकासाच्या संधी स्पष्ट करत हायस्पीड रेल्वेमार्ग अकोलेतून गेल्यास संपूर्ण परिसराला लाभ होईल, असे ठामपणे नमूद करण्यात आले आहे.
या आंदोलनात शिक्षक, पालक आणि स्थानिक नागरिकांनीही विद्यार्थ्यांना नैतिक पाठिंबा दिला. लहान वयातच सामाजिक प्रश्नांबाबत जागरूकता दाखवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
अकोले तालुक्यासाठी निर्णायक ठरणाऱ्या या मागणीसाठी विद्यार्थी, व्यापारी, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक एकत्र येत असल्याचे चित्र सध्या दिसून येत असून, शासनाने या जनभावनेची दखल घ्यावी अशी जोरदार मागणी होत आहे.
