संगमनेर–अकोले रेल्वेमार्गासाठी पुन्हा हालचाली; विखे पाटील यांचा केंद्रावर पाठपुरावा
संगमनेर–अकोले तालुक्याच्या जीवनरेखा ठरणाऱ्या प्रस्तावित रेल्वेमार्गाबाबत पुन्हा एकदा हालचाली सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत. माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या रेल्वे प्रकल्पासंदर्भात महत्त्वपूर्ण भूमिका मांडली आहे.
विखे पाटील यांनी सांगितले की, संगमनेर मार्गे प्रस्तावित रेल्वे लाईनसाठी पूर्वी सर्वेक्षण पूर्ण झाले होते. त्या सर्वेनुसार प्रकल्पाला तत्त्वतः मान्यता मिळून कामाला प्रारंभ होणार होता. भूसंपादनाच्या खर्चापैकी ५० टक्के हिस्सा राज्य सरकार उचलणार, तर उर्वरित प्रकल्प सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) तत्त्वावर राबविण्याचे ठरले होते. यासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करून कार्यकारी संचालकही नियुक्त करण्यात आले होते.
मात्र, नंतर काही तांत्रिक अडचणी व स्थानकासंदर्भातील मुद्द्यांमुळे प्रकल्प रखडल्याचे त्यांनी नमूद केले. रेल्वे मंत्र्यांसमोर याबाबत चर्चा झाली असून, प्रस्ताव पुन्हा तपासून पाहण्याचे आश्वासन मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
या आठवड्यात मुंबई येथे संबंधित अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन संपूर्ण प्रस्ताव, नकाशे आणि फिजिबिलिटी अहवालांची सविस्तर माहिती घेणार असल्याचे विखे पाटील यांनी स्पष्ट केले. २०१९ च्या सर्वेनुसारच रेल्वेमार्ग मंजूर करून काम सुरू करण्याचा आग्रह रेल्वेमंत्र्यांकडे धरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
संगमनेर व अकोले तालुक्याच्या विकासासाठी हा रेल्वेमार्ग अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून, उद्योग, व्यापार आणि प्रवासासाठी मोठी सोय होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाबाबत स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.
