महालक्ष्मी ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेतील ठेविदारांच्या तक्रारी; परतफेडीतील विलंबाबाबत चौकशीची मागणी
अकोले | प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील महालक्ष्मी ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेतील काही ठेविदारांनी त्यांच्या ठेवींच्या परतफेडीस विलंब होत असल्याची तक्रार केली असून, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी पुढे येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनेक कष्टकरी, शेतकरी, आदिवासी बांधव आणि सर्वसामान्य नागरिकांनी या पतसंस्थेत ठेवलेल्या रकमांच्या परतफेडीस विलंब होत असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे संबंधित ठेविदारांना आर्थिक अडचणींसह मानसिक त्रासालाही सामोरे जावे लागत असल्याचा दावा करण्यात येत आहे.
दरम्यान, या तक्रारींमध्ये तथ्य असल्यास संबंधित शासकीय यंत्रणांनी संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि पारदर्शक चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी होत आहे. तसेच, दोषी कोणताही असो, त्याच्यावर कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी आणि प्रत्येक ठेविदाराला त्याचा हक्काचा पैसा वेळेत मिळावा, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
यासोबतच, चौकशी पूर्ण होण्यापूर्वी कोणत्याही कर्मचारी किंवा व्यक्तीवर विनाकारण दोषारोप न करता संपूर्ण व्यवहारांची निष्पक्ष तपासणी होणे आवश्यक असल्याचे मतही व्यक्त करण्यात येत आहे. ठेवीदारांचा विश्वास टिकवणे ही कोणत्याही पतसंस्थेची मूलभूत जबाबदारी असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
(टीप : वरील वृत्त हे प्राप्त झालेल्या तक्रारी आणि नागरिकांनी व्यक्त केलेल्या मागणीवर आधारित असून संबंधित आरोपांची अधिकृत यंत्रणांकडून पुष्टी किंवा निष्कर्ष अद्याप समोर आलेले नाहीत.)
